Saturday, 25 May 2013

मातृभक्ती?



मातृभक्ती?
स्वातीचा फोन आला तेव्हा खरं तर मी अगदी पूर्ण गडबडीत होतो. समोर कुठलासा नवीन पेशंट बसलेला. डोक्यात सगळे विचार त्याचे, सुटायला कठीण असं काही तरी कोडं असतं एकेक पेशंट म्हणजे. अशा वेळी शांतपणे विचार करावा म्हटलं तर हे असे फोन मधे मधे येऊन विघ्न आणतात. विचाराची आपली एक काही दिशा असते, ती पार विस्कटून जाते अशा वेळी. थोडासा वैतागूनच मी फोन उचलला. तोही तो फोन स्वातीचा होता म्हणून. कुठला अनामिक फोन असता तर उचलू नये असंच वाटलं असतं मला. 

‘हं, बोल स्वाती,’

‘सर, तुमच्या त्या दिघे पेशंटकडे होम-विझिटसाठी आले होते,’

‘दिघे? कोण ह्या दिघे?’- माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार. कुणाचीही नावं लक्षात ठेवणे, ही माझ्यासाठी एक मोठीच समस्या असते. हे असं एक नाव ऐकलं की एखादं मधमाश्यांचं मोहोळ उठावं तसे निरनिराळे चेहरे उधळल्यासारखे होतात. असंख्य चेहऱ्यांची एक अविरत मालिका. ह्या दिघे की त्या दिघे, हे पवार की ते पवार. हे कुठले जोशी? वगैरे. आधी नाव आठवायचं, मग त्यामागचा चेहरा, मग त्यामागचा आजार मग त्याचे वैद्यकीय संदर्भ, सामाजिक संदर्भ आठवायचे. मग त्यांच्या नव्यानं निर्माण झालेल्या अडचणी समजावून घ्यायच्या आणि त्यावर तत्काळ तोडगा शोधायचा. आणि हे सगळं करायचं तेही एका फोनवर. एक अवघड परीक्षाच असते ही.

‘सर, त्या दिघे आजी नाहीत का, मनोज सोसायटीतल्या? मागे एकदा त्या घरी पडल्या होत्या तेव्हा मला तुम्ही असंच होम-विझिटसाठी पाठवलं होतं, त्यांच्या घरातले सगळेच जण तुमचे खूप जुने पेशंट आहेत. अगदी किरकोळ डायबेटीस आहे त्यांना?’

स्वाती बिचारी मनापासून प्रयत्न करत होती, माझ्याच पेशंटची आठवण मला करून देण्याचा.
गेली साताठ तरी वर्षं स्वाती माझ्याबरोबर आहे. माझ्या सगळ्या पेशंटना गरजेप्रमाणे वेळोवेळी घरी भेट देणे, त्यांची तपासणी करणे, त्यांना लागेल ती वैद्यकीय मदत घरपोच देणे, त्यांच्या आजाराची मला कल्पना देऊन त्यावर माझा सल्ला घेणे आणि तो पेशंटपर्यंत पोचवणे. अतिशय सफाईदारपणे ही कामे ती आजवर करत आलेली आहे. माझ्या किती तरी पेशंटना माझ्यापेक्षा जास्त तीच ओळखते आजकाल. आता हेच पहा, दिघे आजी आजारी पडल्या तर मलाही कळवण्याआधी त्यांनी स्वातीला परस्पर फोन लावला असणार, म्हणून तर ही तिथे पोचली, थेट, होम-विझिटला! 

‘अच्छा, त्या दिघे होय. त्या तर नुकत्याच इथे माझ्याकडे दवाखान्यात येऊन गेल्या होत्या. तेव्हा तर अगदी ठीक होत्या. रूटीन तपासणीसाठी आल्या होत्या. त्यांना कशाला एकदम होम-विझिट?’

‘नाही सर, गेल्या पंधरा दिवसात बरीच खराब झालीये त्यांची तब्येत. ताप येतोय, बराच दमही लागतोय, ब्लडप्रेशरही वाढलंय. खूप पेल वाटतात. कुठून तरी ब्लीडिंग होत असणार बहुतेक. मला तरी असं वाटतंय की परिस्थिती गंभीर होतीये. मी त्यांना सांगितलंय की त्यांनी हॉस्पिटलमध्ये अॅङमिट व्हावं. हा काही घरच्या घरी मिटेल असा प्रॉब्लेम दिसत नाही मला.’

‘ठीक आहे. दे तशी चिट्ठी तू त्यांना आणि व्हा म्हणावं अॅङमिट. मी बघीन त्यांना थोड्या वेळानं हॉस्पिटलमधे जाऊन.’ मी फोन ठेवण्याच्या गडबडीत होतो. समोरचा पेशंट ताटकळत होता. 

‘नाही सर, मी त्यांना सांगितलंय तसं, अॅङमिट व्हा म्हणून, पण मला नाही वाटत त्या अॅङमिट होतील म्हणून. घरच्या घरीच काय होईल तर बघा असा धोशा लावतायत त्या. काय व्हायचं असेल ते घरीच होऊ द्या म्हणे! आणि सर, त्यांच्या घरचेही तसंच म्हणतायत. नाही इच्छा आजींची तर कशाला त्यांना त्रास. असं म्हणतायत तेही. काय करू?’

‘स्वाती, घरच्या घरी काही करता येणार नाही असा हा आजार आहे अशी खात्री आहे ना तुझी?’
‘हो सर, घरी काही शक्य नाही. त्यांना हॉस्पिटलमधेच ठेवायला लागेल, कदाचित आय. सी. यू. सुद्धा लागेल. ही सगळी कल्पना दिलीय मी त्यांना. पण आजींचा अगदीच हट्ट दिसतो, नाहीच होणार म्हणतात मी अॅङमिट. आणि घरचे सगळेसुद्धा नं सर, त्यांनाच साथ देतायत. नकोचे अॅङमिशन त्यांनासुद्धा.’

‘पण याला आपण काय करू शकतो. तू त्यांना अॅङमिशनची चिट्ठी देऊन टाक आणि नीघ तिथून. अॅङमिट व्हायचं की नाही ते ठरवू दे त्यांचं त्यांनाच.’

कधी एकदा हा फोन ठेवतो असं मला झालेलं. समोर बसलेला तो पेशंट. त्याच्या कपाळावर चढत असलेली एक सूक्ष्म आठी. सगळं मला साफ दिसत होतं. 

मी फोन खाली ठेवला आणि त्या समोरच्या पेशंटशी संवाद पुन्हा सुरु केला. पुन्हा एकदा एक नवी समस्या. नवा निर्णय. काही क्षणातच मी पुन्हा एकदा समोरच्या पेशंटमधे गुंतलो. दिघ्यांना जणू साफ विसरून. मनात मला पूर्ण खात्री होती, दिघे आजी अॅङमिट होणार आणि मला त्यांना तपासायला हॉस्पिटलमधे जावं लागणार. 

गेल्या किती तरी वर्षांचा माझा परिचय होता दिघे कुटुंबाशी. अगदी त्यांचे आजोबा होते तेव्हापासून. इतका जुना काळ की तेव्हा अशा होम-विझिट मी स्वतः करीत असे. माझ्या स्कूटरवर जाऊन. काही काही कुटुंबं आरोग्याविषयी अगदी जागरूक असतात. दिघे मंडळी त्यापैकी. अगदी नियमितपणे येणार, भेटणार, तपासून घेणार. तपासण्यांचे रिपोर्ट स्वतः वाचणार, समजावून घेणार. तपासणीचे निष्कर्ष नॉर्मल येणार ही जणू रीत आणि बघून आनंदी होणे हा जणू त्यांचा हक्क. अशी आजवरची परंपरा. म्हणजे तसं म्हटलं तर आजींचं हे पहिलंवहिलं खरंखुरं आजारपण. त्याच्या उपचाराला कोण नाही म्हणेल. मला खात्री होती, दिघ्यांसमोर दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. ‘अॅङमिट व्हा’ म्हटल्यावर ‘नको’ म्हणणे हा पेशंटचा मूलभूत हक्कच असतो, त्याचे पालन आजी करत होत्या. पण यथावकाश अॅङमिशन अटळ होती.  

दिघे आजींना मनातून तूर्त काढून टाकून मी माझ्या कामाला लागलो. 

बरेच दिवस गेले असावेत. दिघ्यांची मला पुन्हा आठवण आली ती स्वातीचा पुन्हा एकदा असाच कासावीस फोन आल्यावर.

‘सर, त्या दिघे आजींकडे आले होते, होम-विझिटला. मधे नाही का मी तुम्हाला फोन लावला होता, आपण त्यांना अॅङमिट व्हायला सांगितलं होतं, आठवतं? 

‘हो, पण त्या- ‘

‘नाही, त्या तेव्हा अॅङमिट झाल्याच नाहीत आणि म्हणूनच मला आज त्यांनी पुन्हा बोलावलं होतं, विझिटला. आज अगदीच गंभीर परिस्थिती दिसतीये सर, बेशुद्ध आहेत, कसातरी श्वास चालू आहे. मी पुन्हा एकदा त्यांना सांगितलंय की प्रकृती गंभीर आहे, अॅङमिट करण्याशिवाय पर्याय नाही. पण तरी ते म्हणतात घरीच करा, काय करायचं ते. आजींची इच्छा नव्हती अॅङमिट होण्याची. आम्हाला अॅङमिशन नको.’

फोन माझ्या हातात तसाच होता, वरच्या वर धरलेला, ताटकळत. आठवणींची चक्र भरारा फिरू लागलेली. किती दिवस झाले असतील, स्वातीचा मागे फोन येऊन गेला त्याला?- दहा? पंधरा? की तीन-चार आठवडे? जाम आठवेना, पण बरेच दिवस झाले होते हे नक्की आणि इतका कसा पुरता विसरलो मी, दिघे आजींना आणि त्यांना आम्ही अॅङमिट व्हायला सांगितलं होतं त्याला? आणि आजींच्या हट्टासाठी दिघे मंडळींनी त्यांना इतके दिवस घरीच ठेवलं होतं, उपचाराशिवाय? तसंच असणार, नाही तर घरी उपचार देणारा दुसरा डॉक्टर मिळाला असता तर आज पुन्हा स्वातीला कशाला फोन केला असता? 

‘बाप रे, मी विसरलोच होतो, आजी अॅङमिट झाल्या नाहीत ते. इतके दिवस केलं काय त्यांनी घरी?’ मी म्हणालो.

‘काही नाही, सर, त्या पडूनच होत्या घरी. आता अगदीच कसं तरी करायला लागल्या म्हणून बोलावलं त्यांनी मला. मी त्यांना पुन्हा सांगतेय तरी अॅङमिट करायला नाहीच म्हणताहेत ते.’

‘ठीक आहे, नसतील करत तर तू किंवा मी काय करू शकतो? पुन्हा एक अॅङमिशनची चिठ्ठी दे आणि नीघ तिथून.’ मी म्हणालो. मी थंडपणाने म्हणालो. थंडपणाने असं मी म्हणतो खरं पण मला माहित नाही मला जी झाली होती ती भावना केवळ थंडपणाची होती की आणखी कशाची होती. त्यात एक उद्वेग होता, निराशा होती. अगतिकता होती. राग होता. दुःखही असावं त्यात. आपला इतकं जुना पेशंट, जणू एक नातं निर्माण झालेला असा पेशंट. किती तरी वर्षं आपल्याकडे नेमाने येत असणारा. त्याच्या एकुलत्या एक आणि कदाचित अखेरच्या आजारपणात अशी अवस्था यावी की आपण काहीच करू शकू नये? अगदी हातावर हात बांधून शांतपणे बघत राहावं? एक, दोन नाही चांगले पंधरा दिवस- तीन आठवडे रेंगाळणारा आजार पण अगदी काहीही तपासण्यासुद्धा न करता मरणाच्या दारापर्यंत जाऊ द्यावा? डॉक्टरचा आपल्या पेशंटवर किती कमी हक्क असतो, हे मला जाणवलं तेव्हा.

मी फोन ठेवला. पण मनात अस्वस्थता होतीच. त्यातून बाहेर पडणे आवश्यक होते. दिघे प्रकरणातून मनाला सोडविणे आवश्यक होते. अलिप्त राहणे आवश्यक होते. समोर दुसरा पेशंट होताच. त्यात मन गुंतवू लागलो. पण आजींचा विचार मनातून जाईना. त्या मरणाच्या दारात आहेत हे मनातून जाईना.
काही वेळ गेला असेल. एक व्यावहारिक शंका माझ्या मनात जागी झाली. दिघे आजी आता जाणार, मग त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याचे काय? तो कोण देणार? कसा देणार? आणि त्यात आजाराचे निदान तरी काय देणार?

मी तत्काळ फोन उचलला. स्वातीला जोडला.

‘स्वाती, एक अडचण होणारे. आजींच्या मृत्यूनंतर त्यांचा दाखला आपण कसा देणार? त्यात आजाराचं निदान काय टाकणार? मला वाटतं, दिघे मंडळींना ही स्पष्ट कल्पना देणं गरजेचं आहे की अशा परिस्थितीत आजींच्या मृत्यूचा दाखला देणं आपल्याला शक्य होणार नाहीये.’

‘सर, मी आत्ताच त्यांच्या घरून बाहेर पडलीये पण मी परत जाऊन त्यांच्या मुलांशी हे सगळं स्पष्टपणे बोलते. बघू त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी.’

गडबडीनं तिनं फोन ठेवला. मी माझ्या पुढच्या कामाला लागलो.

काही मिनिटं गेली असतील नसतील, पुन्हा माझा फोन वाजला. स्वातीचा फोन. काही तरी अप्रिय संवाद होणार याची जणू खात्रीच असल्यासारखा कडवटपणे मी तो उचलला.

‘मि. दिघे तुमच्याशी बोलतायत, सर,’ इतकंच बोलून स्वातीनं फोन त्यांच्या हातात दिला. आता फोनवर आजींचा मुलगा असणार.

‘डॉक्टर, तुमच्या या स्वाती डॉक्टर आमच्याशी आत्ताच बोलल्या. आश्चर्य आहे, आज आपला इतक्या वर्षांचा परिचय. आणि तुम्ही आजींच्या मृत्यूच्या दाखल्यासाठी खळखळ करावीत.’ क्रुद्ध आवाजात दिघे बोलत होते. हा हल्ला मला अपेक्षित होता पण तो इतका थेट आणि प्रखर असेल असं मात्र वाटलं नव्हतं, पण दिघ्यांच्या बाबतीत नाही तरी आत्तापर्यंत कुठली गोष्ट अपेक्षेबरहुकूम झाली होती?
‘मि. दिघे, असं पाहा, वैद्यकीय दाखला देण्यासाठी माझ्या हातात काही तरी तसा पुरावा नको का की ज्या आधारे मी आजींच्या आजाराचे निदान लिहू शकतो? अगदी एकही तपासणी न करता इतके दिवस रेंगाळत चाललेल्या आजाराची आणि त्याच्या मृत्यूची जबाबदारी मी कशी घेऊ? कुणास ठाऊक, आजींचा आजार कदाचित बरा होऊ शकलाही असता.’

‘म्हणजे, डॉक्टर, केवळ मृत्यूचा दाखला मिळावा म्हणून मी आईला अॅङमिट करावं असं म्हणायचंय का तुम्हाला?’

‘तुमच्या आईंना उपचारासाठी अॅङमिट होण्याची गरज आहे, असं माझं वैद्यकीय मत आहे,’ डोकं शक्य तेवढं थंड ठेवण्याचा प्रयत्न करीत मी म्हणालो.

‘आणि उपचार म्हणजे तरी काय? तुम्ही सुया टोचणार, सलाईन लावणार, ऑक्सिजन लावणार. हेच ना?’ दिघे म्हणाले. वैद्यकीय उपचारांची ते जणू खिल्ली उडवताहेत असा भास मला त्यांच्या या बोलण्यातून झाला.

‘पेशंटला उपचार म्हणून जे जे आवश्यक वाटेल ते सर्व आम्ही करणार.’ मीही निक्षून म्हणालो.

‘ठीक आहे, अगदी अशीच अडवणूक होणार असेल तर करतो मी माझ्या आईला अॅङमिट. होऊ दे तुमच्या मनासारखं. फार तर काय, होईल बिल हॉस्पिटलचं. भरू तेही तुमचीच तशी इच्छा असेल तर.’
दिघ्यांचा राग त्यांच्या त्राग्यातून स्पष्टपणे माझ्यापर्यंत पोचला. माझा नाईलाज होता. मी अडवणूक करून जणू पैशाच्या लालसेनं आजींना अॅङमिट करायला भाग पाडत होतो अशी त्यांची भावना झाली होती. मलाही समजेना मी कुठल्या धर्मसंकटात अडकत चाललो होतो? कारण आता दिघे आजी नाईलाजाने अॅङमिट होतीलही कदाचित पण अशा नाराजीनं अॅङमिट झालेल्या पेशंटला मी कसा उपचार देणार होतो? त्यांच्या कुटुंबियांशी कसा संवाद साधणार होतो?

खिन्न होऊन मी वाट पाहत राहिलो, दिघे आजी अॅङमिट होतील याची. पण सुदैव माझे, त्या अॅङमिट झाल्या नाहीत. माझं धर्मसंकट जणू आपोआपच टळलं.

किती तरी दिवसांनी असंच इकडून तिकडून मला समजलं, दिघे आजी घरीच कालवश झाल्या होत्या. आमचे संवाद झाले त्यानंतरही एखाद-दुसरा दिवस त्या घरीच होत्या. त्यांच्या मृत्यूच्या दाखल्याचं नेमकं काय झालं याची मला कल्पना नाही.

आपल्या आईची इच्छा म्हणून तिचा मृत्यू सुकर करणारे दिघे, ही त्यांची मातृभक्ती म्हणावी का? आणि तसं असेल तर माझी अडवणूक(?) त्यावर मात करू शकली नाही हे सुदैव की दुर्दैव?

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०



Saturday, 11 May 2013

पितृहट्ट



पितृहट्ट
कदम हॉस्पिटलमध्ये येऊन पोचले तेव्हा रात्रीचे आठ तरी वाजले असतील. दवाखान्याचं माझं काम आटोपून मी बाहेर पडणार होतो, ‍तेव्हाच माझा फोन वाजला.
‘साधारण पन्नास वर्षांचा कदम नावाचा मेल पेशंट अॅडमिट करतोय सर, सकाळीच कधी तरी छातीत दुखून गेलं म्हणतोय. आठ-दहा तास तरी उलटून गेले असतील. इ.सी.जी. काढलाय, सर. त्याच्यात हार्ट अॅटॅक दिसतोय, पण आता एवढा वेळ गेलाय की आता औषधांनीच मॅऩेज करावा लागणार. अॅंजिओ काही शक्य नाही आणि आता ह्या क्षणी तर त्याची छातीसुद्धा दुखत नाही म्हणतोय. त्याला आय. सी. यु. मधे घेतलंय, नेहमीची औषधं चालू केलीत.’ हाउसमन डॉक्टर बोलत होता.
दिवसभराच्या कामानं आधीच थकलेला मी, अगदी घरी निघता निघता असा कॉल म्हणजे एक वैताग वाटला मला. नशीब म्हणायचं घरी पोचण्याआधी आला हा कॉल, नाही तर पुन्हा उठून हॉस्पिटलमधे यावं लागलं असतं. 
हॉस्पिटलमध्ये पोचलो तोवर कदम चांगले स्थिरावले होते. आय. सी. यु. मधे पलंगावर आरामशीर पडलेले होते. मध्यम शरीरयष्टी, थोडेसे अकाली पांढरे झालेले केस, त्यांच्या नुसत्या झिपऱ्या इतस्ततः पसरलेल्या. पाहून वाटलं त्यांना कधी पाण्याचा स्पर्श तरी झाला होता की नाही! डोक्यावरच्या केसांसारखीच अस्ताव्यस्त दाढी. राखाडी मळकट चेहरा. भुवयांचे केससुद्धा असेच राखाडी, मोठे मोठे वाढलेले. त्यांच्यामुळे त्यांच्या चेहऱ्याला एक उग्र रागीटपणा आलेला. त्यांना पाहून ते काही आजारी असतील असं कुणाला वाटलं नसतं. वाटलं असतं रागावलेत हे कुणावर तरी. उगाचच जरब बसावी असाच चेहरा असतो काही जणांचा. कदम त्यांच्यातले.
त्यांच्या जवळ जात मी त्यांची चौकशी केली. माहिती घेतली. कधी दुखलं, कसं दुखलं, आधी कधी दुखलं होतं का – एकामागून एक विचारले जाणारे जुजबी प्रश्न. पण प्रश्नांचं हे असलं चऱ्हाट कदमांना मंजूर नसावं. अगदी नाराजीनं ते उत्तरं देत होते. उडवाउडवी केल्यासारखी. ‘हा’, ‘नाय बा’, ‘नाय तं काय’ अशा स्वरुपाची. 
‘तुम्हाला कुठल्या काही सवयी वगैरे?’
‘म्हंजे?’ एकदम वरच्याच स्वरात त्यांनी विचारलं.
‘म्हणजे, बिडी-काडी, दारू असलं काही-‘
‘न्हाय, न्हाय, तसलं न्हाय काय’- अगदी सहजपणे त्यांनी सांगितलं. इतक्या सहजपणे की माझी खात्रीच झाली, कदम खोटं बोलतायत. त्यांचं एकूण रूप, त्यांचा एकूण अवतार, त्यांची बेफिकिरी आणि निर्व्यसनी? कसं शक्य आहे.
मी आसपास पाहिलं. पलंगाच्या एका कडेला एक बाई उभ्या दिसल्या. इतका वेळ तिथंच असणार त्या पण जणू अस्तित्वशून्य. पदराचा बोळा तोंडात कोंबून उभ्या. कदमांची धर्मपत्नी. मी ओळखलं. अशा वेळी बायकांची फार मदत होते. नवऱ्यांच्या सवयी म्हणजे त्यांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय. अगदी मनापासून भडाभडा बोलतील त्या ह्या विषयावर.
‘काय हो, कसली सवय नाही म्हणतात हे.’
मी पुढे काही म्हणायच्या आत, फिसकन हसल्या बाई. नवऱ्याकडे लटक्या रागानं पाहत.
‘अवो, सांगा की वो, डॉक्टरांन्ला. सांगा न्हवं खरं काय ते,’
कदम शांत होते. शून्यात नजत लावून शांत. चाललेल्या चर्चेत जणू रसच नसल्यासारखे. पूर्ण अलिप्त. काय ओळखायचे ते मी समजलो. खोलीतून बाहेर पडलो. 
बाहेर कुणी चार-पाच माणसं वाट पाहात थांबली होती. त्यांच्याशी बोललो. समजावून सांगितलं. ‘हार्ट अॅटॅक आहे, पहिले दोन-तीन दिवस काळजीचे आहेत. इथे आय.सी.यू. त ठेवावे लागेल. मग बाहेर साध्या खोलीत काही दिवस.’ वगैरे वगैरे. त्यांनी सगळं ऐकून घेतलं, एक-दोघांनी समजल्यासारख्या माना हलवल्या. एक-दोघे संशयी नजरेनं पाहात राहिले. काही तरी न पटल्यासारखे.
‘पेशंट तुमचे कोण लागतात?’ निघता-निघता मी चौकशी केली.
‘ह्ये, आमचे पाहुणे, गाववाले न्हवं,’ त्यांच्यातल्या एकानं पुढे होत उत्तर दिलं.
‘आणि त्यांचा मुलगा -?’
‘ह्यो काय, ह्यो त्येंचा पोरगा,’ एकानं मागच्या एका तरुणाकडं बोट दाखवलं. म्हणायचा पोरगा पण हा तर पार मागं उभा. कशातच नसल्यासारखा.
‘आरं, व्हो ना म्होरं, डागदर पुसतायत न्हवं,’ असं म्हणत दोघांनी त्याला पार ढकललं तेव्हा कुठं तो समोर आला. मळकट कपडे. अगदी फाटके नाहीत पण कधीही फाटतील अशा अवस्थेतले. शर्टवर ठिकठिकाणी ऑइलचे डाग. चेहऱ्याचीही अवस्था तीच, ऑइलमय़. पोरगा मेकॅऩिक असणार कुठल्या तरी गॅरेजमधे. 
‘वडील आहेत का रे ते तुझे?’
‘होय, साहेब.’ पुढे येत तो म्हणाला.
‘आणि काम काय करतोस तू?’
‘रिक्षा चालवतो साहेब, रिक्षा आहे माझी.’
‘कुणी इतर भाऊ, बहीण वगैरे?’
‘आहेत ना साहेब, दोघं हायेत. पण त्ये बारके आहेत. शाळेत शिकतात.’
‘आणि तू? शिकला की नाही काही?’ 
‘दहावी नापास आहे साहेब’.
कदमांची कौटुंबिक परिस्थिती ही अशी. कठीण आहे. स्वतः व्यसनी. थोरला पोरगा रिक्षा चालवणार. उरलेले दोघे बारके, असेच अर्धे-कच्चे शिकणारे. 
‘वडील काय करतात तुझे?’ 
‘वडील? काय नाय साहेब. वाचमन हुते दोन वर्षापूर्वी. आता घरलाच असतात.’
म्हणजे आनंदच म्हणायचा. घराचा मिळवता पुरुष म्हणजे हा पोरगाच दिसतो, रिक्षा ड्रायव्हर. त्याचीही समज यथातथाच. बाप असा हार्टचा पेशंट आहे हे तरी त्याला समजलंय की नाही त्याचाही मला अंदाज येईना. 
कुठल्याही गंभीर आजारावर इलाज करताना ह्या आर्थिक पार्श्वभूमीचा विचार करावाच लागतो. माझ्याबरोबर काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना नेहमीच मी हे सांगतो. पेशंटचे निदान सर्वंकष असावे. नुसते वैद्यकीय नको. त्याची कौटुंबिक परिस्थिती, आर्थिक कुवत, सामाजिक पार्श्वभूमी सगळ्याचा विचार करून उपचार ठरवा. कुठल्याही आजाराचे उपचार आजारानुरूपच असणार हे खरं असलं तरी या बाजूच्या परिस्थितीचा त्याच्याशी संबंध असतो. किती तरी वेळा हे घटकच जास्त निर्णायक ठरतात. भले तुमच्याजवळ लाखो, करोडो रुपये किमतीचा दागिना आहे विकायला, समोरच्या माणसाच्या खिशात त्याच्या खरेदीसाठी तसा पैसा नसेल तर त्याला त्याचे काय मोल असणार? कुठल्याही आजाराचे निदान झाल्यावर त्याच्यावरच्या उपचाराने पेशंटला मिळणारा आनंद आणि त्यासाठी त्यानं मोजलेले पैसे यांचं गणित जेव्हा जमतं तेव्हाच पेशंटला अंतिम समाधान मिळतं. हे समाधान म्हणजेच डॉक्टर आणि पेशंट यांच्या परस्पर संबंधांची मुहूर्तमेढ असते.
कदमांचं आर्थिक गणित व्यस्त होतं. त्या ओढाताणीचा विचार करीतच उपाय योजना करणं गरजेचं होतं. नाही तर आजकाल हृदय विकाराच्या आजारावर कितीतरी महागड्या उपाय योजना करणं शक्य आहे. त्यांचा वापर तारतम्यानं करावं लागतो. ‘सब घोडे बारा टक्के’ असा न्याय लावणं धोक्याचं ठरतं. सुदैवानं कदमांचा आजार मध्यम तीव्रतेचा होता. जास्त महागड्या उपचारांची गरज बहुधा लागू नये असा. 
खरं तर नंतर काहीच विशेष घडलं नाही. दिवसागणिक सुधारणा होत कदम चांगलेच सुधारले. त्यांची घरी जाण्याची वेळ आली. घरी पाठवण्यापूर्वी अशा पेशंटची आम्ही स्ट्रेस टेस्ट करतो. त्यांना थोडं चालवून पाहातो. तेवढ्यानं जर त्रास झाला तरच पुढच्या महागड्या टेस्ट सांगतो. कदमांची स्ट्रेस टेस्ट झाली. चांगली झाली. नुसती औषधे घेतली तरी भागावे अशी. कदमांना हे शुभ वर्तमान मी ऐकवले. पण मला अपेक्षा होती ते समाधान काही त्यांच्या चेहऱ्यावर उमटले नाही. नाही तरी आल्या दिवसापासून मी त्यांना आधी हसल्याचे पाहिलेच नव्हते. काही लोक मृदू भावना व्यक्त करण्याच्या बाबतीत जणू अशक्त असतात. कदम तसे असणार. अगदी घरी जाण्याची वेळ आली तरी त्यांची कपाळावरची सूक्ष्म आठी कायम होती. खोलीतून मी बाहेर पडणार तोच त्यांनी विचारलं,
‘त्ये, आमचं गाववालं म्हणत हुतं, ती काय ती फुग्याची ट्रीटमेंट का नाय दिली म्हणून. ते इथले कोण हार्ट स्पेशालीस्ट बी म्हणून ऱ्हायले त्ये करावं म्हणून.’
अरे बाप रे, म्हणजे कदमांची बाहेर समांतर चौकशी चालू होती तर. त्यांना angioplasty करून हवी होती तर. मी त्यांना अशिक्षित समजण्यात चूक केली होती जणू. पुढच्या उपचाराचा पर्याय न देण्याचं माझं कारण एकच होतं की त्या पर्यायाची त्यांना गरज नव्हती आणि ते पेलवण्याची त्यांची क्षमता नाही हा मी आगाऊपणे काढलेला निष्कर्ष होता. त्यांच्या अर्धवट वयातल्या अर्धवट कमावत्या मुलाच्या नजरेतलं आर्जव मला दिसलं होतं म्हणून माझा मीच काढलेला तो निष्कर्ष होता. मी पाहिलेलं ते आर्जव तरी खरं होतं की मला झालेला भासच निव्वळ. मी गोंधळलो.
‘तुमच्या प्रकृतीला सध्या तरी त्याची गरज नाही. पुढे काही दिवसांनी पुन्हा तपासणी करू आणि गरज पडली तर करूच की ती फुग्याची ट्रीटमेंट. आणि शिवाय ही ट्रीटमेंट करायची म्हणजे बराच खर्च येईल, अगदी आम्ही बरीच सूट दिली तरी तो खर्च खूपच असेल. कसा झेपेल तुम्हाला तो? चौकशी केलीय सगळी मी तुमच्या मुलाजवळ. म्हणून तर म्हणतो खर्च जपून करू. अगदी नाईलाज झाला तरच करू.’ मी स्वच्छ व्यवहारच त्यांच्या समोर मांडला. इच्छा नव्हती इतकं स्पष्ट बोलण्याची पण आता नाईलाज होता म्हणून बोललो. 
‘पैशाची काळजी नको डाक्तर. पोट्टा काय न्हाय बोलला व्हय ट्रीटमेंटला? असा कसं बोलंल? येळ आली तं इकू दये ना ती रिक्षाबी. ’ कदम म्हणाले. 
हे मला अतर्क्य होतं. आयुष्यभर वॉचमनची किरकोळ नोकरी करायची. जमवलेला पैसा दारूत उडवायचा. पन्नाशीच्या वयात आपलं एक आजारपण झेपू नये अशी आर्थिक कुवत असणारा हा गृहस्थ. मुलाच्या रिक्षेवर डोळा ठेवून असावा, तोही अशा रिक्षेवर की जी त्यांच्या सगळ्यांच्याच चरितार्थाचे एकमेव साधन होती. धन्य आहे! पूर्वीच्या काळी विद्यादानानंतर गुरु गुरुदक्षिणा मागत असत. ही प्रथाही मला अन्यायकारक वाटे. पण त्यात तरी एक काही व्यवहार होता, देवाणघेवाण होती. कदमांची ही पितृदक्षिणा म्हणजे सगळाच एकतर्फी आतबट्ट्याचा व्यवहार होता.
‘बघू, बोलतो मी मुलाशी’ असं सांगून मी बाहेर पडलो. पण प्रकरण सोपं नव्हतं, आणि ते यथावकाश माझ्या लक्षात येत गेलं.
खोलीबाहेर ते कोण गाववाले उभेच होते. 
‘काय म्हनतो आमचा पेशंट, बरा हाय नव्हं’, एकानं पुढं होत मला जवळजवळ अडवलंच.
‘हो, चांगले आहेत, आता घरी पाठवायचं म्हणतोय आम्ही त्यांना.’ म्हणत मी पुढे चालत राहिलो.
‘न्हाय, म्हंजी, अमी काय म्हनतो, त्यांची तो फुग्यावाली ट्रीटमेंट नाय केली तुमी. करायची व्हती ना ती बी.’
‘हो, तो निर्णय काही दिवसांनी घ्यायचा असं ठरवलंच आहे आम्ही.’
‘न्हाई, म्हणजे आसं पहा डागदर, तुम्ही मस त्येंना घरी सोडलं पन थितं जाऊन काय झालं वंगाळ म्हंजी कसं व्हायचं वो. तुम्हीच इचार कराया पायजे न्हवं,’ कुणी गाववाला म्हणाला. मी थांबलो. त्याच्याकडे वळून पाहिलं. त्याच्या डोळ्यात अर्धवट शहाणपणाची आग मला स्पष्ट दिसली. इतकं सगळं छान होऊनही मलाच गुन्हेगार ठरविण्याचा त्याचा प्रयत्न होता.
‘अहो, असं कसं होईल. आपण तपासण्या केल्यायत ना त्यांच्या. सगळे रिपोर्ट चांगले आले आहेत. ते बघून तर मी सोडतोय ना त्यांना घरी.’
‘आरंच्या, म्हंजी अगदी ग्यारंटीच दिसती तुम्हाला जनू!’ हे कुणी दुसराच बोलला. त्यातला विखार झोंबणारा होता. 
चालता चालता मी थांबलो. मागे वळून पाहात थांबलो. ते सगळेही थांबले. हे कोण होते, परवाचेच गाववाले की कुणी नवेच. मला कळणं शक्यच नव्हतं. त्या सगळ्यांच्या मधून मी मागं पाहिलं. त्या गर्दीत मागे जणू लपलेला, ओशाळलेला तो मला दिसला, कदमांचा मुलगा. रिक्षा ड्रायव्हर. अगदी पार मागे, परवासारखाच दूरदूर पळू पाहात असलेला. त्याला मी खुणावलं. 
‘मुलगाच ना रे तू त्यांचा?’
'हो, साहेब.’
‘जरा मला खाली येऊन भेट एकट्यानं. बोलायचंय मला तुझ्याशी.’ मी म्हणालो.
माझी कामं होईतो चांगला तासाभराचा वेळ गेला असणार. खाली उतरून गाडीपर्यंत गेलो तर मागे-मागे येणारा तो मला दिसला. कदमांचा मुलगा. एकटाच होता. चेहऱ्यावर तोच ओशाळलेला भाव. मला जिच्यात आर्जव दिसलं ती नजर.
मी थांबलो.
‘काय, मग, करायची का पुढची ट्रीटमेंट? वडलांची इच्छा दिसते तुझ्या तशी,’ मी म्हणालो.
‘होय, साहेब, पार मागंच लागल्येत माझ्या. ती रिक्षापण वीक पण ट्रीटमेंट कर म्हणून. आता रिक्षा विकली तर खायचं काय हो. पण ऐकतच न्हाईत ते तं काय करू?’
‘आणि आत्ता वर माझ्याशी बोलले ते, ते कोण? कोण जवळचे नातलग आहेत का? आणि करणारे का कुणी त्यातलं काही पैशाची मदत तुला?’
‘त्ये, कसले हो, गाववाले नुसते. मजा बघतील. मदत कोण करणार, छे, कुनीच न्हाई’. तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर अपार काळजी होती. एक न सुटणारा तिढा.
‘बघू, मी आज काही घरी सोडत नाही, पुन्हा त्यांच्या छातीत दुखलं तर बघू,’ असं म्हणत मी बाहेर पडलो.
दवाखान्यात पोचलो, तर हॉस्पिटलमधून पुन्हा फोन. कुणी नगरसेवक फोनवर बोलू इच्छीत होते.
‘नमस्कार, डॉक्टरसाहेब.’
‘नमस्कार, नमस्कार,’ मी.
‘ते कोण कदम अॅडमिट म्हणे आपल्याकडे. नाराज नका हो करू त्यांना. काय म्हणतात ती करून टाकायची हो ट्रीटमेंट. आता अशा वेळी पैशाची गोष्ट करायची म्हणजे बरं नाही, नाही का. मी काय म्हणतो करून टाका काय ती ट्रीटमेंट. पैशाचं काही अडलं तर बघूच की आपण. कदम आपला माणूस आहे. काही चिंता नको, काय?’
मी अवाक. फोन हातात धरून सुन्न झालेलो. काही बोलण्यापलीकडे गेलेलो. नशीब त्यांनीच तिकडून फोन ठेवला.
कदमांची प्रकृती उत्तम असूनही मी गुन्हेगार ठरतो की काय अशी चिता मला लागून राहिली.
पण ही अवस्था फार काळ राहिली नाही. काही तासातच पुन्हा फोन आला. कदमांच्या छातीत पुन्हा दुखायला लागलं होतं. पुन्हा इ.सी.जी. काढला, त्यात काहीही बदल नव्हता, पण बदल आता माझ्यात झाला होता. मी तत्काळ पुढील आदेश दिले, त्यांची angioplsty करून घेतली.
याला काही वर्ष उलटली आहेत. कदम अजून माझ्याकडे येत असतात. त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या मुलांनी रिक्षा विकली की आणखी काही विकून पैसे उभे केले हे मला समजलेलं नाही. त्यानंतर तोही मला कधी भेटलेला नाही.
कदमांच्या बरोबर हा जो काही प्रसंग झाला, त्यात मी हरलो हे निःसंशय, पण मला प्रश्न आहे तो वेगळाच, स्वतः कदम तरी जिंकले की हरले? हे कसं ठरवणार?

डॉ. संजीव मंगरुळकर
दूरभाष: ९४०५०१८८२०